‘टक्केवारीपेक्षा गुणवत्ता’ हा नवा लातूर पॅटर्न.

लातूर | दि/05/05/2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून लातूर विभागाचा निकाल ८९.४६ टक्के इतका आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत ही टक्केवारी कमी भासली, मात्र हा निकाल गुणवत्तेचा आणि पारदर्शकतेचा आहे, हे नक्की. राज्य शासनाच्या ‘कॉपीमुक्त परीक्षा केंद्र’ मोहिमेचा लातूर विभागात प्रामाणिक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांची सतत गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि शिक्षण विभागाची काटेकोर समन्वयामुळे नकलखोरीला यंदा आळा बसला.
परीक्षा केंद्रांवरील वातावरण यंदा पूर्णतः बदलले होते. लातूर शहरातील एमआयटी कॉलेज, वसंतराव नाईक महाविद्यालय, दयानंद कॉलेज या केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त होता. काही केंद्रांवर अचानक पोलीस आणि व्हिजिलन्स पथकांनी भेटी देत नकलखोरीच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई केली. याचा परिणाम म्हणजे यंदा केवळ मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी निकाल मिळवला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील गंगा महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोनाली कदम म्हणाली, “यंदा बाहेरून मदत मिळणार नाही हे माहित होतं, त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच अभ्यासावर भर दिला. आमच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं.”
तसेच, अहमदपूर तालुक्यातील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थी ओंकार पाटील म्हणाले, “गेल्या वर्षीपासूनच शिस्त लागली होती. यंदा कुठेही कॉपीची शक्यताच नव्हती. निकाल थोडा कमी वाटतोय पण निदान आपण खरी मेहनत केली, याचं समाधान आहे.”
लातूर विभागातील धाराशिव जिल्ह्याचा निकाल ९२.३२ टक्के असून तो विभागात सर्वोच्च आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९०.८२ टक्के, तर लातूर जिल्ह्याचा ८६.६८ टक्के आहे. राज्यात एकूण निकाल ९१.८८ टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी लातूर विभागात ९३.६३ टक्के असून, मुलांची टक्केवारी ८५.९९ इतकी आहे.
पूर्वी लातूर पॅटर्न म्हणजे फक्त उच्च टक्केवारी असलेला निकाल, अशी छबी होती. मात्र, यंदा टक्केवारीपेक्षा प्रामाणिक गुणवत्तेला महत्त्व देणारा नवा लातूर पॅटर्न तयार होत असल्याचं चित्र आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक प्रा. मनोज भोसले म्हणाले, “या मोहिमेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. खऱ्या अर्थाने प्रामाणिक विद्यार्थी पुढे येत आहेत. हे दीर्घकालीन दृष्टीने समाजासाठी फायदेशीर ठरणार आहे.”