“दुषित पाण्याच्या मुद्द्यावर भाजपाचं आंदोलन: खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न?”

लातूर | बेधडक आवाज
लातूर शहराला गेल्या काही आठवड्यांपासून दूषित आणि वास मारणारं पाणी मिळत आहे. या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या वतीने महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनाचं स्वरूप आणि त्यामागचा हेतू यावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
आजच्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या बॅनरवर अभिषेक करून आरोप लावले. मात्र, काँग्रेसने भाजपावर “फेक नॅरेटिव्ह” पसरवण्याचा आरोप केला आहे.
लातूर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली 10 एप्रिल रोजीच काँग्रेसने महापालिकेवर धडक देत दूषित पाणीपुरवठ्याविरोधात आंदोलन केलं होतं. या वेळी प्रभारी आयुक्तांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 16 एप्रिल रोजी खुद्द आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत आढावा बैठक घेऊन या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचे व्हिडिओ व वृत्त सर्वच माध्यमांतून झळकले होते.
काँग्रेसच्या मते, भाजप हे मुद्दाम जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. महापालिकेतील प्रशासकीय कारभार सध्या राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असून, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री भाजपचेच आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सवाल आहे – “शासन तुमचं, प्रशासन तुमचं, मग आंदोलन कोणाविरुद्ध?”
काँग्रेसने याआधीही भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या “हळद मिसळून पाणी स्वच्छ दाखवण्याच्या” प्रयोगावर टीका केली होती आणि आता पुन्हा एकदा भाजपने लातूरकरांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लातूर काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लातूरकर हुशार आहेत. भाजपच्या खोट्या नॅरेटिव्हला बळी पडणार नाहीत. लातूरकरांना सत्य काय आहे, हे चांगलंच माहिती आहे.”