काँग्रेसच्या वतीने लातूरमध्ये ३ मार्चला शेतकरी आंदोलन.

बेधडक आवाज लातूर, १ मार्च २०२५: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ३ मार्च रोजी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी २८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस भवन येथे जिल्ह्यातील तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत शेतकऱ्यांना वीजपुरवठा, पीक विमा, कर्जमाफी, कृषी अवजारेवरील जीएसटी, सोयाबीन संशोधन केंद्र, देवणी वळू संशोधन केंद्र, ठिबक अनुदान, सोयाबीन फरक, सौर पंप, उत्पादनखर्चाच्या आधारावर हमीभाव, दूध दरवाढ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.


जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे कर्जबाजारीपणा आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून, सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ काँग्रेसचे नसून प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्कांसाठी आहे. काँग्रेस पक्ष शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत राहील.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके, सहकार विभाग जिल्हाध्यक्ष रवि काळे, महिला काँग्रेस अध्यक्षा शीलाताई पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, सेवादल जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, समन्वयक प्रा. ओमप्रकाश झुरळे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागीरदार, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष सिकंदर पटेल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, डॉक्टर विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद भातांब्रे, किसान सेल जिल्हाध्यक्ष किशोर टोम्पे, इंटक जिल्हाध्यक्ष राजकुमार कत्ते, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष रामराजे काळे तसेच तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.