लातूरच्या यात्रेच्या प्रवेश शुल्कावरून वादंग,खासदारांचा जनहितार्थ पाठपुरावा.

बेधडक आवाज – लातूरच्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यात्रा महोत्सवाच्या प्रवेश शुल्कावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या शुल्काला विरोध दर्शवत प्रशासनाकडे निवेदने दिली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीची दखल घेत खासदार साहेबांनी या संदर्भात अधिकृत पत्र दिले.
लातूरच्या पूर्व भागातील अनेक नागरिक रोजंदारीवर काम करणारे आहेत. अशा परिस्थितीत 40-50 रुपयांचे शुल्क सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे. मागणीच्या अनुषंगाने शुल्क २० रुपये करण्यात आले, तसेच यात्रेकरूंना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
या मुद्द्यावरून काहींनी राजकीय हस्तक्षेप असल्याचे मत मांडले. मात्र, यात्रेचे बाजारीकरण थांबवण्यासाठी हा पाठपुरावा करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सिद्धेश्वर यात्रा महोत्सव हे लातूरकरांसाठी श्रद्धेचे प्रतीक असून, तिच्या पारंपरिक स्वरूपात कोणताही बदल होऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे.
यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आणि सर्वसामान्य यात्रेकरूंना कोणताही आर्थिक भार न पडण्यासाठी हा मुद्दा उचलण्यात आला असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.