केंद्रीय अर्थसंकल्पाने सामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांची निराशा – आ. अमित देशमुख

Latur दि 01/02/2025– केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पात उद्योगवाढीला चालना, शेतीमालाच्या भाववाढीसाठी ठोस उपाययोजना, तसेच महागाई कमी करण्यासाठी कोणत्याही ठोस योजना नसल्याची टीका आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
शेतकरी आणि युवकांची घोर निराशा
देशातील शेतकरी मोठ्या अडचणीत असताना केंद्र सरकारने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, असा आरोप आ. देशमुख यांनी केला आहे. मागील काही वर्षांपासून आयात धोरणामुळे देशातील गहू, भात, डाळी, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र, त्यांच्या उत्पादन खर्चात कपात किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही.
याशिवाय, रोजगार वाढीच्या आश्वासनांवरही सरकार अपयशी ठरले आहे. मागील दहा वर्षांपासून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता नवीन गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका त्यांनी केली.
नोकरदार वर्गासाठी दिलासा, पण अप्रत्यक्ष करांचा बोजा
सरकारने नोकरदार वर्गासाठी आयकर स्लॅबमध्ये काही प्रमाणात सवलत जाहीर केली असली, तरी इतर अप्रत्यक्ष कर आणि जीएसटीच्या माध्यमातून हा भार पुन्हा त्यांच्या खिशातूनच वसूल केला जाणार असल्याचे स्पष्ट आहे, असेही आ. देशमुख म्हणाले.
महाराष्ट्रावर अन्याय, बिहारला झुकते माप
देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक कर भरणाऱ्या राज्याची दुर्लक्ष करीत बिहारमध्ये आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मखाना बोर्ड, ग्रीन फिल्ड विमानतळ, आयआयटीचा विस्तार यासारख्या घोषणा बिहारसाठी करण्यात आल्या असून, यावरून हा संपूर्ण अर्थसंकल्प केवळ राजकीय स्वार्थासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते,” असे आ. देशमुख म्हणाले.
महागाईत होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना दिलासा नाही
महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी कोणतेही ठोस उपाय नसल्यानं या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा भ्रमनिरास झाला आहे, असेही आ. देशमुख यांनी म्हटले आहे.