लातूर शहरात भाजपचा भूमिपूजनाचा गोंधळ, काँग्रेसकडून प्रशासनाला जाब.

लातूर (प्रतिनिधी): लातूर शहरात भारतीय जनता पक्षाकडून विकास कामांसाठी भूमिपूजनाचा गोंधळ उडाला आहे. कोणती योजना, कोणत्या निधीतून, कोणत्या मंजुरीनंतर हे काम सुरू होत आहे, याबाबत महापालिकेला कोणतीही माहिती नसताना भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित केल्याने काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.प्रभाग 14 मध्ये भाजपकडून विकास कामाच्या भूमिपूजनाची जाहिरात झाली आहे, मात्र या कामांची कोणतीही माहिती महानगरपालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्यावर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्तांशी चर्चा केली, मात्र त्यांनीही कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले. विकास योजना मंजूर कोणी केली? वर्क ऑर्डर निघाली आहे का? निधी कोणाच्या माध्यमातून आणला? आणि कोणती एजन्सी हे काम करणार आहे? असे अनेक प्रश्न विचारले गेले. परंतु प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.काँग्रेसने हा प्रकार प्रशासन आणि भाजप यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. “जर प्रशासनाने अशा अनधिकृत कार्यक्रमांवर वेळीच कारवाई केली नाही, तर सभापतींकडे तक्रार दाखल करण्यात येईल,” असे काँग्रेसने जाहीर केले आहे.या शिष्टमंडळात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर स्मिता खानापुरे, अशोक गोविंदपुरकर, इमरान सय्यद, प्रा. प्रवीण कांबळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेला विश्वासात न घेता सुरू असलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि भाजप यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला आहे.