स्वामित्व योजनेमुळे शेतकऱ्यांचा जमिनीचा वाद मिटणार!

बेधडक आवाज (नागपूर)-
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना स्वामित्व योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ करतील. डिजिटल पद्धतीने देशभरात हा कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये 30515 गावांमध्ये ही योजना सुरू होणार आहे.

स्वामित्व योजना ग्रामीण भागातील मालमत्ता व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. जमिनीच्या मालकी हक्काचे डॉक्युमेंट, प्रॉपर्टी कार्ड आणि गावठाण नकाशे डिजिटल स्वरूपात नागरिकांना दिले जातील. यामुळे जमिनीच्या वादांचा निरास होईल, आर्थिक पत उंचावेल, गृहकर्ज घेणे सुलभ होईल, आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईल.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मिळालेल्या माहितीनुसार, गावठाण क्षेत्रातील घरांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे बांधकाम परवानग्या मिळवणे आणि मालमत्ता कराचे व्यवस्थापन सुलभ होईल. ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठीही महत्त्वाची ठरेल.
बावनकुळे म्हणाले की, स्वामित्व योजनेमुळे स्वयंपूर्ण गावठाण आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. यासह आधुनिक पद्धतीने मालकी हक्क निश्चित करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील आर्थिक स्थैर्य वाढेल.