“चार महिन्यांचा चारा एका दिवसात! जिल्हाधिकाऱ्यांचं चिमणीप्रेम फक्त फोटोसाठी?”

लातूर, १६ एप्रिल:Bedhadak awaj
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वृक्षांवर धान्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वन विभागाच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र झाले. चिमण्यांना उन्हाळ्यात अन्न-पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या निवासस्थानीही अशीच सुविधा उपलब्ध करून इतर नागरिकांना देखील तसेच आवाहन केले होते.

मात्र, आज केवळ एका महिन्यानंतरच या उपक्रमाची वस्तुस्थिती पाहता हा उपक्रम केवळ एक दिवसापुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र उभे राहिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चिमण्यांसाठी ठेवलेले पाण्याचे कुंडे आज अस्तित्वातच नाहीत, केवळ दोन कुंडे उरले असून त्यातही पाण्याचा थेंबही नाही. धान्याची तर कुठेच व्यवस्था दिसून येत नाही.
या उपक्रमाची गंभीरता आणि सातत्य याचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. जेव्हा पाणी व चारा पुन्हा भरण्यातच येत नाही, तेव्हा चिमण्यांनी चार महिन्यांचं पाणी व चारा एका दिवसातच संपवून समाधान मानावं, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दाखवले गेलेले चिमणीप्रेम हा एक दिवसाचा “दिखावा” होता का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
चिमण्यांना व पक्ष्यांना खरंच मदत करायची असेल, तर फक्त एका दिवशी उपक्रम राबवण्यापेक्षा सातत्यपूर्ण कृती गरजेची आहे, अन्यथा हे उपक्रम फक्त फोटोसेशनपुरतेच उरतात.