
Bedhadak awaj लातूर प्रतिनिधी: लातूर येथील 700 वर्षे जुने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेची पौराणिक उज्वल परंपरा गेली 71 वर्षे अखंडपणे सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, पशु प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध वस्तूंची खरेदी-विक्री होत असते. यात लातूरसह राज्यभरातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने भक्तगण आणि व्यापारी सहभागी होतात.
मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या यात्रेच्या पारंपरिक मूळ स्वरूपात मोठा बदल होऊन व्यापारीकरण वाढले आहे. आनंदमेळा नावाने खासगी कंत्राटदारामार्फत यात्रा चालवली जात असून, प्रवेश शुल्क, दर्शन पास शुल्क तसेच व्यावसायिकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याने यात्रेचे बाजारीकरण झाले आहे. परिणामी, सर्वसामान्य भक्तांसाठी ही यात्रा महागडी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर, यात्रेचे खाजगीकरण व व्यापारीकरण थांबवण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते नितीन चालक, दीपक गंगणे, मुनावर शेख यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि धर्मदाय आयुक्त यांना निवेदन दिले आहे. तसेच, लातूर शहरातील अधिकारी, कार्यकर्ते आणि संचालक मंडळाच्या सदस्यांना मोफत व्हीआयपी पास दिले जात असल्याने सर्वसामान्य भाविकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे हे पास बंद करावेत आणि सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
लातूरच्या आमदाराने या मागणीचा पाठपुरावा करावा, अशीही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.