तळेगावच्या शेतकऱ्यांना दिलासा: काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा न्यायासाठी पुढाकार.

बेधडक आवाज – (अहमदपूर)
१० डिसेंबर
तळेगावातील १०३ शेतकऱ्यांना वक्फ न्याय प्राधिकरणाकडून आलेल्या नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. आर्थिक अडचणींनी आधीच ग्रस्त असलेल्या या शेतकऱ्यांना नोटिसांमुळे जमिनी जप्त होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर लातूर काँग्रेसचे शिष्टमंडळ गावात पोहोचले आणि शेतकऱ्यांना न्यायासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं.

राज्याचे माजी मंत्री आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तळेगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव अभय साळुंके, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, सेवादल जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांसह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी उपलब्ध दस्तऐवज शिष्टमंडळाला सादर केले. शिष्टमंडळाने या प्रकरणाचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
काय आश्वासन दिलं?
जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी सांगितलं की, “शासकीय परवानग्यांनी झालेल्या व्यवहारांचे कागदपत्रे शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार नाही. मात्र, थोडा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागेल. या लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी राहील.”
तळेगावातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या न्यायासाठी लढण्याचं बळ मिळालं असून, काँग्रेसने दाखवलेल्या या पाठिंब्यामुळे परिस्थिती काहीशी निवळली आहे.
उपस्थित शेतकरी:
मोतीराम शेळके, रमेश दाबके, प्रशांत कानवटे, विश्वंभर पवार यांच्यासह गावातील अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते.
काँग्रेसचा संदेश:
“आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणार असून, त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी कोणताही मागे हटणार नाही,” असं काँग्रेसने ठामपणे स्पष्ट केलं.