संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर खून झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे.

बेधडक आवाज -(बीड)
केज तालुक्यातील मस्साजोग गावात सरपंच आणि मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर खून झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक, सीआयडी चौकशी, तसेच जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी शांततापूर्ण रास्तारोको आंदोलन सुरू केलं आहे.
आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे भेट दिली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि आंदोलकांच्या मागण्यांना बळ दिलं.
घटनेचा मुद्दा काय?
मस्साजोग येथे अवादा कंपनीचा मोठा पवनचक्की प्रकल्प सुरू आहे. मात्र, या प्रकल्पावर गावगुंडांचा वचक आहे. हे गावगुंड धनंजय मुंडे यांचा वरदहस्त लाभलेले असल्याचा आरोप आहे. हे गुंड कंपनीकडून हप्ते मागत असून, काही दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता.
या वेळी सरपंच संतोष देशमुख यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली होती, ज्यामुळे या गुंडांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. मात्र, अटक होऊन लगेचच त्यांना जामीन मिळाला. जेलमधून सुटल्यानंतर या गुंडांनी राग मनात ठेवून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला.
गुंडगिरीला राजकीय पाठबळ?
बीड जिल्ह्यात गुंडगिरीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी बीडमध्ये विशिष्ट जातीच्या पोलीस व अधिकाऱ्यांना पाठिंबा दिला असून, गुंडांना कायद्याची भीती उरलेली नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाज संयम बाळगतो, कोणावरही अन्याय करत नाही, परंतु जर संयम सुटला, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.” त्यांनी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाचा रोष
या घटनेमुळे मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. आंदोलनाला मोठा जनसमर्थन मिळत असून प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.