शास्त्रीय संगीताच्या स्वरांजलीतून लोकनेत्याला भावपूर्ण आदरांजली; नागरिकांनी आठवली साहेबांची लोककल्याणकारी कामगिरी.

लातूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आज सोमवार, दि. २६ मे २०२५ रोजी बाभळगाव येथील ‘विलासबाग’मध्ये सार्वजनिक आदरांजली कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि श्रद्धायुक्त वातावरणात पार पडला.
सकाळी ८.४५ वाजता नागरिक, मान्यवर, कार्यकर्ते आणि देशमुख कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असताना सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘इंद्रायणी काठी’, ‘चिन्मया सकल हृदया’ अशा भक्तिगीतांच्या माध्यमातून विलासराव देशमुख यांना भावस्वरांजली अर्पण केली. संगीताच्या स्वरात आणि लोकांच्या नयनांत अश्रूंमध्ये या महान नेत्याच्या स्मृती पुन्हा उजळून निघाल्या.

कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी विलासरावजींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आमच्या शेतात पाणी आलं ते साहेबांच्या बॅरेजमुळे,” असे म्हणत अनेक शेतकऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. “सहकारी साखर कारखाने उभे राहिले, ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाला, हे सर्व त्यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं,” असे ग्रामस्थांनी सांगितले. अनेकांनी “साहेब आमच्याशी वागायचे ते आपल्या माणसासारखं – कुठलाही बडेजाव नाही, तोच माणूसपणा आज हरवतोय,” असे भावनिक उद्गार काढले.
तरुण कार्यकर्त्यांनीही साहेबांच्या नेतृत्वशैलीचे कौतुक करत “त्यांचं राजकारण हे विकासाभोवती केंद्रित होतं, त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आणि राजकारणात नवा विश्वास दिला,” असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आठवण काढली. “ग्रामीण भागात महाविद्यालयं सुरू करून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उजळवलं,” असं एका माजी विद्यार्थ्याने सांगितलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे व सचिन सूर्यवंशी यांनी केले. देशमुख कुटुंबीयांच्या वतीने जनतेचे आभार मानण्यात आले आणि यापुढेही विलासरावजींच्या कार्याची प्रेरणा घेऊन लोककल्याणासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार अनेक कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आला,
हा अभिवादन सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर लाखोंच्या मनात घर केलेल्या नेतृत्वाच्या आठवणींचा, त्यांच्या योगदानाच्या गौरवाचा भावनिक आविष्कार होता जिथे प्रत्येक श्रद्धेच्या पुष्पामागे एक हृदयस्पर्शी आठवण जपली गेली.