क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी यंत्रणा सक्रिय,

लातूर -दि/27/05/2025
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लातूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अवैध धंदे आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांवर तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या. खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

लातूर हे शांत, सुरक्षित व शैक्षणिक वैभव असलेले शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांतील घटनांनी ही ओळख धोक्यात आली आहे. ट्युशन हब म्हणून नावारूपाला आलेल्या भागात ड्रग्स रॅकेट उघडकीस येणे हे चिंतेचे लक्षण आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना न सुटलेला हा गुन्हा बाहेरून आलेल्या पथकांनी उघडकीस आणला, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

अलीकडच्या काळात शहरात खून, घरफोड्या, मटका व इतर अवैध धंदे वाढले आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटना या सर्वच गोष्टी नागरिकांच्या सुरक्षेच्या भावना डळमळीत करत आहेत. शहरात कोट्यवधींच्या खर्चातून बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नाही, हे देखील बैठकीत अधोरेखित झाले.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे यांनी अलीकडील कारवाया आणि आरोपींना अटक केलेल्या प्रकरणांची माहिती दिली. तसेच बैठकीत चर्चिलेले मुद्दे गांभीर्याने घेत तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

मात्र, या बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला — वर्षानुवर्षे लातूर शहरातच “स्थायिक” झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न. गुन्हेगारी रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करायची असेल, तर स्थानिक गुन्हेगारीशी हातमिळवणी झालेल्या, अथवा अनौपचारिक साखळीचा भाग ठरलेल्यांची तत्काळ बदली होणे आवश्यक आहे. पण प्रशासनाकडून दरवेळी याकडे दुर्लक्ष होत असल्याने, हा मुद्दा हेतुपुरस्सर झाकला जातोय, अशी भावना आता सामान्य नागरिकांतही तयार होत आहे.

लातूरचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख हे स्थानिक परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवणारे नेतृत्व मानले जातात. मात्र या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेलेले नाही, ही बाब खटकणारी आहे. गुन्हेगारीला आळा घालायचा असेल, तर कारवायांइतकीच “अंतर्गत स्वच्छता” गरजेची आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शहरातच टिकून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा विषय केवळ पोलीस अधीक्षकांवर न ठेवता आमदार देशमुख यांनी देखील गांभीर्याने हाताळावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

गुन्हेगारीविरोधी मोहिम फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात परिणामकारक ठरावी, यासाठी सर्व संबंधितांनी कृतीशील पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button