
लातूर -दि /27/05/2025
अवघ्या काही तासांच्या पावसाने लातूर शहराचं अक्षरशः पाणीपंचनामं केलं आहे. संपूर्ण शहरात रस्ते ओसंडून वाहत आहेत, दुकानात, घरात पाणी घुसलेलं आहे आणि सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. रस्त्यांवर वाहतूक बंद आहे. दुचाकी, चारचाकी पाण्यात अडकून पडलेल्या आहेत. अनेक नागरिकांना चप्पल हातात घेऊन, पायातल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, महिलांना मोठ्या त्रासातून जावं लागत आहे.
ज्या रस्त्यांवरून नेहमी शहर चालतं, तिथं आज पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. काही भागात तर घरातलं सगळं सामान पाण्यात भिजून गेलं आहे. व्यावसायिकांचे माल आणि कोणाचं किराणा दुकान पाण्यात तरंगतंय, कोणाच्या घराचं अंगण तलावात बदललंय.

ही परिस्थिती अचानक आलेल्या महापुरासारखी नाही. दरवर्षी पावसाळ्यात हीच पुनरावृत्ती होते आणि दरवेळी प्रशासनाचे आश्वासन तेवढंच शिल्लक राहतं. नाले वेळेवर साफ होत नाहीत, पाणी वाहून नेणाऱ्या मार्गांची अडथळे दूर केल्या जात नाहीत आणि त्याचंच फलित म्हणून लातूर शहर आज थेट पाण्यात बुडालं आहे.
नागरिक वैतागले आहेत. “हे शहर आहे की तलाव?” असा संतप्त सवाल ते विचारत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही, विद्यार्थी भिजतच शाळेत जातात, कामावर जाणारे लोक वाटेतच अडकून पडतात. आणि एवढं सगळं घडत असताना कुठलंच जबाबदार यंत्रणाचं पदाधिकारी या भागात फिरताना दिसत नाही.
ही निसर्ग आपत्ती नाही, तर पूर्णपणे व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. लातूर शहराला आज दिलासा हवा आहे, पण तो पाण्यात अडकलेल्या कोणालाही मिळत नाहीये. प्रशासन फक्त आकड्यांमध्ये बोलतंय, प्रत्यक्षात मात्र लातूरकरांचे पाय, वस्त्र आणि स्वप्नं – सगळं पाण्यात भिजून गेलं आहे.