पीकविमा तक्रार नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी; शिवसेनेकडून मुदतवाढीची मागणी.

लातूर, दि. 15 मे 2025
खरीप 2024 च्या पीकविमा योजनेपासून वंचित राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने तक्रार अर्ज सादर करण्यासाठी 15 मे ही अंतिम मुदत दिली आहे. मात्र, तक्रार नोंदणीच्या प्रक्रियेत तालुकास्तरावर प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचे चित्र समोर आले आहे.
तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये हजारो शेतकरी आपले अर्ज घेऊन तक्रारी नोंदविण्यासाठी येत आहेत. मात्र, केवळ दोन कर्मचारीच उपलब्ध असल्यामुळे प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. यामुळे अंतिम मुदतीच्या दिवशीसुद्धा अनेक शेतकरी अर्ज सादर न करता परत फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात शेतकरी पुन्हा एकदा पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे 25 मेपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी लेखी मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शिवसैनिकांनी हे निवेदन सादर केले.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते. प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.