बाभळगावमध्ये आर्वी गावच्या नागरिकांच्या अडीअडचणींवर सखोल चर्चा,,

बाभळगाव (प्रतिनिधी) –दि 23/05/2025
आज सकाळी बाभळगाव येथे आमदारांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरपंच आणि माझीसरपंचांच्या पुढाकारातून ही भेट घडून आली. नागरिकांच्या अडीअडचणींचा थेट आढावा घेत आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
या भेटीत आर्वी गावातील मूळ रहिवाशांच्या घराच्या कबाल्याचा प्रश्न, गायरान व वडार वस्तीतील वीजपुरवठा सुलभ करण्यासाठी डीपी बसविण्याची आवश्यकता, सोमवंशी नगरमधील ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी, आर्वी स्मशानभूमीची दुरवस्था यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने सरपंच व माझीसरपंचांनी थेट आमदारांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या प्रयत्नाला यश मिळून आमदारांनी स्वतः सर्व मुद्द्यांची नोंद घेत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. संबंधित विभागांशी थेट फोनवरून संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले.
यावेळी नागरिकांच्या भावना ऐकून घेत त्या सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “आमच्या मागण्या आता फक्त कागदावर राहणार नाहीत, प्रत्यक्षात अंमलात येतील,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.