
लातूर, दि. 23 मे 2025 – लातूर शहरातील अवैध अंमली पदार्थ व्यापाराला रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत 81 हजार 800 रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री सुतमील परिसरात करण्यात आली असून, एक महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य पुरवठादार फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात ही कारवाई अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर पद्धतीने पार पडली. गुप्त माहितीच्या आधारे सुतमील परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास करण्यात आलेल्या छाप्यात, महिलेसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईतून अवैध धंद्यांची मुळे उखडण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
पकडलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
- ऋषीकेश शेषराव राठोड, वय 28, रा. नाथनगर, लातूर
- संयम बालाजी पडीले, वय 26, रा. उदगीर
- 35 वर्षीय महिला, रा. सुतमील रोड, लातूर
- अनुप नवनाथ सोनवणे, रा. निगडी, पुणे (फरार)
फरार आरोपी अनुप सोनवणे याची पत्नी या महिला आरोपीने आपल्या घरात 16.36 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज बाळगला होता. त्याची अंदाजे बाजारमूल्य 81,800 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर चार मोबाइल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2 लाख 82 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरलेले साहित्य पाहता, आरोपींचा व्यवसाय पद्धतीने ड्रग्ज विक्रीचा उद्योग सुरू असल्याचे स्पष्ट दिसते.
या संपूर्ण कारवाईत कायदेशीर प्रक्रिया पाळून पंचांच्या उपस्थितीत जप्ती केली गेली आहे. या गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीसाठी शोधमोहीम सुरू आहे.
कारवाईतील पोलीस पथक –
उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन दरेकर, मनोज खोसे, गोविंद भोसले, राहुल कांबळे, नितीन कठारे, चंद्रकांत डांगे, बंडू नीटुरे, प्रदीप चोपणे या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस अत्यंत शिस्तबद्ध आणि जोखीम पत्करून ही कारवाई केली.
कौतुकास्पद पोलिस कार्य –
या कारवाईतून लातूर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. रात्री उशिरा धाड घालून महिलेसह आरोपींना अटक करणे, मुद्देमाल जप्त करणे आणि कायद्याचे सर्व नियम पाळणे हे पोलिसांच्या प्रशिक्षित आणि सजग मानसिकतेचे दर्शन घडवते. लातूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक संभाव्य तरुणांचे आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचले आहे, असेच म्हणावे लागेल.