दररोज ४ ते ५ अपघात, अनेकांचा मृत्यू – पण प्रशासन गप्प!

लातूर | प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग घोषित झालेला लातूर-जहीराबाद रस्ता सध्या अपघातांचा अखंड सत्र घडवत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे हा महामार्ग ‘रस्ता’ न राहता ‘मृत्यूचा सापळा’ ठरला आहे. जागोजागी पडलेल्या खोल खड्डे आणि धोकादायक भेगांमुळे प्रवास करणं म्हणजे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणं आव्हान बनलं आहे.
दररोज ४ ते ५ अपघात, अनेकांचा मृत्यू – पण प्रशासन गप्प!
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या रस्त्यावर दररोज ४ ते ५ अपघात घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी सुखरूप घरी परत येईल की नाही, याची शाश्वती उरलेली नाही.
“

रस्ता आमच्या जिवाचा आहे, तो सुरक्षित असायलाच हवा!”
या गंभीर स्थितीकडे राज्य व केंद्र शासन पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची संतप्त भावना आता जनतेत तयार झाली आहे. जिल्हाध्यक्ष, NSUI लातूर – रामराजे तानाजीराव काळे यांनी याबाबत ठोस मागण्या करत प्रशासनासमोर एक स्पष्ट इशारा दिला आहे.
महत्वाच्या मागण्या:
- रस्त्यावरील सर्व भेगा व खड्डे तात्काळ बुजवावेत.
- चेतावणी फलक, अपघातसूचक चिन्हे व स्ट्रीट लाइट्सची तातडीने उभारणी करावी.
- दुचाकी व हलक्या वाहनांसाठी तात्पुरता सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
- अपघातग्रस्त भागात ‘Ambulance Point’ व ‘Emergency Help Booth’ उभारावेत.
- ठेकेदारावर गुन्हा दाखल करून, कामाच्या गुणवत्तेची चौकशी जाहीर करावी.
- मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई व जखमींना वैद्यकीय मदत तात्काळ द्यावी.
- अपघातांची अधिकृत आकडेवारी आणि सुधारणा योजना जाहीर करावी.
प्रशासनाने जागं व्हावं, अन्यथा जनआंदोलन अटळ!
रामराजे काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना याची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘हा रस्ता केवळ प्रवासाचा नाही, तर आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे’ – लातूर जिल्हावासीयांची एकमुखी मागणी
प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून तातडीने कृती करेल, अशी अपेक्षा आता सामान्य जनतेला आहे.