लातूर जिल्ह्यात 1 कोटींचा गांजा नष्ट; 22 गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट.

लातूर, 17 एप्रिल 2025
पोलीस प्रशासनाच्या “पोलिस स्टेशन स्वच्छता मोहीम” अंतर्गत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे पडून असलेला अंमली पदार्थांचा साठा अखेर नष्ट करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल 22 गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 496 किलो गांजाला, कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल म्हणून नष्ट करण्यात आला.
पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माळरानावर हा गांजा 15 एप्रिल रोजी अधिकृतरीत्या जाळून नष्ट करण्यात आला. ड्रग डिस्पोजल कमिटी, दोन पंच, तसेच संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातील सात कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात “पोलिस स्टेशन स्वच्छता मोहीम” राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, 2001 पासून न्यायप्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या गुन्ह्यांमधील अंमली पदार्थ पोलीस मुख्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. न्यायालयीन निर्णयानंतर त्यांच्या विल्हेवाटीचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीवन मिरकले, राखीव पोलिस निरीक्षक गफार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या मोहिमेद्वारे लातूर पोलीस प्रशासनाने फक्त भौतिक स्वच्छता नव्हे तर कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारी विरोधातील कठोर भूमिका अधोरेखित केली आहे.