देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

लातूर जिल्ह्यात पीकविमा वाटपात गोंधळ – शिवसेनेची चौकशीची मागणी, आंदोलनाची चेतावणी.

लातूर | खरीप हंगाम 2024-25 मध्ये पीकविमा लाभाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ते भरूनही अद्याप विमा रक्कम मिळालेली नाही, तर काही बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मोठी तफावत असून, बहुतांश शेतकरी अन्यायग्रस्त आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. वर्षा घुगे-ठाकूर यांची भेट घेऊन सखोल चौकशी व कार्यवाहीची मागणी करणारे निवेदन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या –

1. 2024-25 हंगामात पीकविमा भरलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या जाहीर करावी.

2. पीकविमा लाभार्थ्यांची यादी व त्यासाठी वापरलेले निकष स्पष्ट करावेत.

3. मंजूर व न-मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची माहिती आणि नकाराचे कारण पोर्टलद्वारे सार्वजनिक करावे.

4. केलेल्या पंचनाम्यांची पडताळणी, बोगस प्रकरणांवर कार्यवाही व विमा वितरणातील तफावतांचे स्पष्टीकरण द्यावे.

5. सध्या बंद असलेले पीकविमा कार्यालय तात्काळ सुरू करावे.

6. पीकविमा वाटपात मोठा घोटाळा झाला असून, एकाच गटातील शेतकऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. 80% शेतकरी अद्याप विम्यापासून वंचित आहेत.

शिवसेनेने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा SBI पिकविमा कंपनीच्या विरोधात “शिवसेना स्टाईल” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शासन आणि विमा कंपन्यांमधील विसंवादाचा फटका थेट शेतकऱ्यांच्या पोटावर बसत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button