क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रशिक्षण

परीक्षा संपण्याच्या दिवशीच उचललं टोकाचं पाऊल.

लातूर –21/05/2025
लातूरच्या गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमेन्स पालिटेक्निक कॉलेजमधील १७ वर्षांची विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे हिने मंगळवारी दुपारी होस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. गायत्री ही संगणक अभियांत्रिकीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ही घटना तिच्या परीक्षा संपण्याच्या अंतिम दिवशी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गायत्री ही मूळची नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंग्याळ गावची रहिवासी होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान तिची शेवटची परीक्षा होती. मात्र, परीक्षा सुरू असतानाच ती सुमारे ३ वाजता होस्टेलमध्ये परतली आणि तेव्हा बहुतेक मुली परीक्षा केंद्रावर असल्याने होस्टेल रिकामं होतं. याचाच फायदा घेत तिने ओढणीने गळफास घेतल्याची माहिती आहे.

प्राचार्य सूर्यकांत राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीच्या पहिल्या सत्रातील काही विषय अपूर्ण होते आणि ती दुसऱ्या सत्राच्या परीक्षांना सामोरी जात होती. कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी होस्टेलमध्ये घडलेली घटना त्यांना कळवली.

दरम्यान, प्राथमिक तपासात ही आत्महत्या परीक्षा तणावामुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी इतर कारणांनाही नाकारता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. तिच्या पालकांचे जबाब घेतल्यावर आणि पुढील तपासानंतर खरे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीला परीक्षा दरम्यान कपटाचार करताना पकडण्यात आले होते. शिस्तभंगाची कारवाई आणि समाजात होणारी बदनामी याच्या भीतीने तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा संशय वर्तवण्यात येतो.

या घटनेनंतर कॉलेज प्रशासनाने पहिल्या वर्षातील सर्व विद्यार्थिनींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींच्या होस्टेलमध्ये हलवलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button