विलासराव देशमुख मार्गावरील भाजी व फळ विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेची मागणी.

बेधडक आवाज -लातूर (दि. 28जानेवारी)
शहरातील विलासराव देशमुख मार्गावर गेली अनेक वर्षे किरकोळ भाजी व फळ विक्रेते आपला व्यवसाय करत होते. या व्यवसायावर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी लातूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करत हे सर्व विक्रेते त्या ठिकाणावरून हटवले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मंगळवारी (दि. २८ जानेवारी) महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून या विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महापालिकेने या विक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिकृत परवाने दिलेले असताना त्यांना कोणताही पर्याय न देता हटवले गेल्याने त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या निर्णयाचा परिणाम फक्त विक्रेत्यांवरच नव्हे, तर स्थानिक नागरिकांवरही झाला आहे. बार्शी रोड परिसरातील नागरिकांना दररोज लागणारा भाजीपाला मिळवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांसाठी लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव, इमरान सय्यद, आयुब मणियार, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, गोटू यादव, दत्ता सोमवंशी, आसिफ बागवान, गौस गोलंदाज, खाजा शेख, सायरा पठाण, सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.